नांदेड: डॉ.प्रदीप राजपूत
(ले.वा.न्यूज नेटवर्क)
ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाची घोषणा केली आहे.
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या नियोजनाने नांदेड जिल्ह्यातही या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात १एप्रिल २०२६ पासून करण्यात आली आहे.
माझं गांव, आरोग्य संपन्न गांव या अभियानाचे स्वरूप आणि उद्दिष्टे विशेषतः या अभियानाचा मुख्य उद्देश असा की,ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करणे हा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने हे अभियान राबवण्यात येत आहे,केवळ उपचार करण्यापेक्षा ‘आजार रोखणे’ (प्रतिबंधात्मक उपाय) यावर या मोहिमेत अधिक भर दिला जाणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल स्वच्छता आणि सुरक्षित पाणीपुरवठा,सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन,माता-बाल आरोग्य आणि पोषण,मानसिक आरोग्य तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण करण्यात येणार आहे.
या अभियानासाठी बक्षिसेही ठेवण्यात आले असून
या अभियानांतर्गत गावांमधील कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. ज्या गावांना ठरवून दिलेल्या निकषांनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतील, त्यांना ‘आरोग्य संपन्न गाव’ या खिताबाने सन्मानित करण्यात येईल.
यामध्ये प्रोत्साहनपर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गावांचा गौरव केला जाणार आहे.
राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी ५ कोटी (प्रथम), ३ कोटी (द्वितीय) आणि २ कोटी (तृतीय) रुपयांची मोठी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तसेच पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरही लाखांच्या घरात बक्षिसे दिली जाणार आहेत,लोकसहभागाचे आवाहन
हे अभियान केवळ सरकारी योजना नसून ती एक ‘सामाजिक आरोग्य चळवळ’ ठरणार आहे.
१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत ही स्पर्धात्मक अंमलबजावणी सुरू राहणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती,प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपला जिल्हा आणि गाव आरोग्यदृष्ट्या संपन्न करावा,असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.